शिराळा, ता.११ :शिराळा येथे ११ मारुती पैकी एक समर्थ रामदास स्वामी स्थापित वीर हनुमान मंदिर आहे. शके १५७६ सन १६५५ ला म्हणजे सुमारे ३६८ वर्षा पूर्वी या मंदिराची उभारणी समर्थ रामदास स्वामी यांनी केली आहे. ही मूर्ती चुनखडी,शाडू,गोमुत्र, गाईचे शेण यापासून बनवलेली आहे. उद्या हनुमान जयंत असल्याने येथे कीर्तन,दासबोध,जन्मकाळ,महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शिराळा येथील महादजी देशपांडे हे समर्थ रामदासस्वामी यांचे शिष्य होते. त्यांच्या आग्रहास्तव रामदास स्वामिंनी येथे हनुमान मंदिराची उभारणी केली आहे. या मंदिर स्थापनेवेळी रामदास स्वामी शिराळा येथील मनोहर बुवा हसबनीस यांच्या घरी वास्तव्यास होते. हे मंदिर पूर्णतः दगडात आहे. हनुमान मूर्तीच्या चेहऱ्या जवळ दोन्ही बाजूला दोन झरोके आहेत. त्यामुळे सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे हनुमानाच्या चेहऱ्यावर येतात. सतत मूर्तीच्या गाभाऱ्यात झरोक्यामुळे खेळता वारा असतो. मंदिर पूर्ण झाल्या नंतर रामदास स्वामीचे शिष्य महादजी देशपांडे हे हनुमानाची सेवा करू लागले .त्यांतर आता त्यांचे वंशज विनय देशपांडे, जयंत देशपांडे, उद्धव देशपांडे, पांडुरंग देशपांडे, नारायण देशपांडे ,राहुल देशपांडे हे प्रत्येक वर्षी पूजा करत आहेत.
मंदिर बांधकाम पूर्ण होताच रामदास स्वामी निघून गेले. जाताना त्यांनी हसबनीस यांना रामपंचायतन(पटाधीश राम) ही मूर्ती भेट दिली आहे. या मूर्तीमध्ये राम असून त्यांच्या मांडीवर सीता बसलेली आहे. एका बाजूला भरत आणि दुसऱ्या बाजूला शत्रूघन आहेत. ते रामाला चौऱ्या घालत आहेत. समोर उजवीकडे मारुती व डावीकडे लक्ष्मण उभे आहेत अशी मूर्ती आहे. त्या मूर्ती सोबत दासबोध व कुबडी भेट दिली आहेत. रामदास स्वामींची जुनी वस्त्रे ही हसबनीस यांच्याकडे अजून आहेत. या दास बोधाची मूळ प्रत ही धुळे येथील श्री समर्थ वाग्देवता मंदिर येथील कार्यालयास हणमंत हसबनीस यांनी ३१ मे १९९८ ला भेट दिला आहे. त्याचा उपयोग पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थाना होत आहे. त्याची झेरॉक्स प्रत शिराळा येथे उपलब्ध आहे.
रामनवमीला बापूसाहेब हसबनीस यांच्या घरी मोठ्या प्रमाणात राम जन्मकाळ सोहळा साजरा करतात. राम जन्मकाळ साजरा झाल्यानंतर लगेच राम व हनुमान यांची भेट होऊन मंदिरात आरती केली जाते. त्यानंतर हा सोहळा संपन्न होते. हनुमान जयंतीला हनुमान जन्म सोहळ्या नंतर राम व हनुमान यांची भेट होते .त्यानंतर कीर्तन समाप्ती नंतर हा जन्म सोहळा संपन्न होतो. रामनवमी व हनुमान जयंती ला राम आणि हनुमान यांची भेट झाल्या शिवाय दोन्ही कार्यक्रम संपन्न होत नाहीत.
0 Comments