शिराळा,ता.११: तालुक्याती ज्या पाणी योजनांच्या कामाला गती मिळत नसेल त्या ठिकाणी ठेकेदारावर कारवाई करून त्यांचा ठेका रद्द करू दुसऱ्या ठेकेदाराची नेमणूक करण्यात येईल. प्रलंबित असणाऱ्या पाणी पुरवठा योजना जलद गतीने पूर्ण करून कुठे ही पाण्याची अडचण येणार नाही असे नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिशे यांनी दिली.
शिराळा पंचायत समितीच्या विविध विभागाच्या आढावा घेण्यासाठी शिराळा येथे आल्या होत्या.त्यावेळी माजी जिल्हापरिषद सदस्य रणधीर नाईक यांनी त्यांची भेट घेवून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तालुक्यातील सर्व गावांच्या अपुऱ्या असणाऱ्या कामाच्या संदर्भात चर्चा केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी धोडमिसे यांनी पाणीपुरवठा विभागाचे उपभियंता शाळिग्राम साळुंखे यांना तातडीने शिराळा तालुक्यातील सर्व योजनांचा अहवाल देण्यास सांगितले.
यावेळी रणधीर नाईक म्हणाले,शिराळा तालुका हा डोंगर,उतार व डोंगर कड्या कपारी मध्ये वसला आहे. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची फार मोठी अडचणी,गैरसोय निर्माण होत असल्याने शासनाने शिराळा तालुक्यातील गावांना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नव्याने ३८ पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या. या योजनांच्या कामांची सुरुवात झाली. मात्र या योजनांची अनेक कामे अर्धवट,प्रलंबित असलेली पाहावयास मिळत आहे.उन्हाळा कडक जाणवत असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या निर्माण होत आहे. या योजना लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी काही ग्रामपंचायत सरपंच व नागरिकांनी एक महिन्या पूर्वी पंचायत समिती समोर आंदोलन केले होते. यावेळी पाणीपुरवठा विभागाकडून ३८ योजनांचे काम पूर्ण करण्यात येईल असे तारीख निहाय वेळापत्रक तयार करून लेखी आश्वासन देण्यात आले होते. त्या प्रमाणे काही गावांमध्ये ठेकेदारांनी कामाला सुरुवात केली नसल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांच्याकडून येत आहेत .त्यामुळे आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यामध्ये लक्ष घालून प्रलंबित असणाऱ्या योजनांना गती द्यावी अशी मागणी नाईक यांनी केली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे ,गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पाणी पुरवठा विभागाचे उपभियंता शाळिग्राम साळुंखे, मंणदूर माजी सरपंच वसंत पाटील, के. वाय. भाष्टे, राजू पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
0 Comments