शिराळा : विज्ञान तंत्रज्ञाच्या युगात कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर ऊस शेती क्षेत्रास सुरू झाला असून, फायदेशीर व अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी काळ बदलतोय तसे शेतकऱ्यांनीही बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘विश्वास’ कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र व नेटाफिम कंपनीच्या सहकार्याने कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान व भविष्यातील ऊस शेती विषयावर ‘स्मार्ट शेतकरी संमेलन’ मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-सरुडकर प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्ष श्री. नाईक म्हणाले, ‘विश्वास’ कारखान्याने नेहमी शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रगतीचा व हिताचा विचार जपला आहे. नवीन तंत्रज्ञाचा वापर करत आलो आहे. कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने 40 टक्के उत्पन्न वाढ तर, 30 टक्के उत्पादन खर्चात बचत झाल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाय ऊस शेत जमिनीमधील अचूक व आधुनिक माहिती मिळते. त्यामुळे ऊस शेतीमधील कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञाचा वापर शेतकऱ्यांना अधिक सक्षम करणारा व फायदा देणारा ठरणारा आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी गुठ्यांत असणारे शेतकऱ्यांचा समूह शेतीचा प्रयोग राबविण्याचा विचार संचालक मंडळ करत आहे.
नेटाफिमचे कृषी तज्ञ श्री. अरुण देशमुख म्हणाले, शिराळा व शाहूवाडी डोंगराळ विभाग आहे. येथे सलग शेती नसून डोंगर, दऱ्यात, नदीकाठावर, काळी, मध्यम व मुरमाड स्वरूपाची आहे. बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करावा. त्याला नव्याने आलेल्या कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची जोड द्यावी. निश्चित ऊस शेतीमध्ये त्याचा फायदा अपेक्षीत आहे. राज्यातील अजूनही 80 टक्के शेतकरी पाट पाण्यावर ऊस शेती करतो. ग्रामीण महाराष्ट्राची प्रगतीत ऊस शेतीचा मोठा हात आहे. हुकमी पीक म्हणून ऊस शेतीकडे पाहिले जाते. त्यासाठी जमिनीची सुपीकता चांगली असली तर ऊसपीक जोमात येते. दर तीन वर्षांनी ऊस बियाणे बदलणे गरजेचे आहे. ऊस शेतकऱ्यांना सुखी व समृद्ध करण्याची ताकद ठिबक सिंचन व कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान प्रणाली आहे.
कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे कृषी तज्ञ श्री. डॉ. संतोष देशमुख म्हणाले, ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीत कशाची आवश्यकता आहे, याची नेमकी माहिती या तंत्रज्ञानाच्या वापरातून मिळते. जमिनीचा वाफसा, सूर्यप्रकाश, वाऱ्याचा वेग व दिशा, कीड व रोगांचा प्रार्दुभावाची पूर्वकल्पना, रोगाचे नियंत्रण करण्याची माहिती, जमिनीत नत्र, स्फुरद, पालाशची मात्रा माहिती आदींचा समतोल राखण्याबाबत मार्गदर्शन, तापमान, पर्जन्यमापक, आदीची माहिती मिळून त्यानुसार शेतकऱ्यास हवामान अंदाजाची अचूक माहिती पुरविली जाते. त्यामुळे पिकांस सर्व गोष्टी समतोल प्रमाणात मिळून ऊस शेती फायदेशीर होते. बारामती येथील प्रयोगात एकरी 150 टनापर्यंत उसाचे उत्पन्न मिळाले आहे. यावेळी फसल कंपनीचे सौरभ कटके यांनी शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या कृत्रीम बुद्धिमत्ता यंत्राबद्दलची सविस्तर माहिती दिली.
प्रास्ताविकात विराज नाईक म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वैद्यकीय व वाहन निर्मिती क्षेत्रानंतर आता शेती क्षेत्रात होत आहे. हे तंत्रज्ञान ऊस शेतीसाठी फायदेशीर आहे. आपल्या जमिनीची नेमकी परिस्थिती व कशाची गरज आहे याची अचूक माहिती शेतकऱ्यांना मिळते. भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणार आहे. ग्रामीण व डोंगराळ भागातील शेतकरी यामध्ये मागे राहाता कामा नये. त्यासाठी ‘विश्वास’ कारखान्याने प्रयत्न सुरू केले आहेत.
प्रारंभी दीपप्रज्वलनाने विराज नाईक उद्घाटन केले. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाबद्दल प्रश्न विचारले. त्याची तज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यकारी संचालक अमोल पाटील, कारखान्याचे आजी, माजी संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अनेक गावचे आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सोसायट्याचे पदाधिकारी, कारखान्यातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक शिवाजी पाटील यांनी आभार मानले.
ऊस शेतीमध्ये कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यास इच्छुक शेतकऱ्यांना कारखाना अनुदान देणार आहे. याबाबत लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊ, असे मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.
0 Comments