BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असा करा गणेशोत्सव


कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरे करू-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गणेश मंडळांना आवाहन


 मुंबई दि.१८-  यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळाला केले आहे.
    आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात आज मंत्रालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.   
       या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्रीद्वय  सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार, आमदार महोदय, मुख्य सचिव अजोय मेहता, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल,  प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई.रवींद्रन व इतर वरिष्ठ अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर, राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे, याबद्दल तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. शिर्डी सिद्धिविनायक व या सारख्या संस्थांनी त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी देखील मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जी मदत केली तसेच सामाजिक उपक्रम राबवले त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
      बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, हे खरे आहे की नेहमीप्रमाणे यंदा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही.  कोरोनाचा धोका संपलेला नाही, गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत.  कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता , योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल.
      ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी  आपण घेऊ पण उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावेच लागेल. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करू,यासाठीचा कार्यक्रम निश्चित करून आपण हा सण साजरा करू असे ही मुख्यमंत्री म्हणाले.
     गणेश मंडळांच्यामार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल याचा आपण विचार करू व हा उत्सव साजरा करू. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

आरोग्याची काळजी घ्यावी -उपमुख्यमंत्री

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी मार्गदर्शन
करताना सांगितले की, ज्याप्रमाणे पुण्यातील गणेश मंडळांनी  गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरवले आहे त्याचे स्वागत.या निर्णयाचे  सर्वांनी अनुकरण करावे व त्याचे पालन करावे. असे आवाहन त्यांनी केले. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या वारीने देखील शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले.     
     कोरोनाची जागतिक समस्या आहे, पुढील काळ कदाचित अधिक आव्हानात्मक असेल. त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी तसे नियोजन करावे.  पुढील काळात आषाढी, दहिहंडी, स्वातंत्र्य दिन असे महत्त्वाचे सण-उत्सव आहेत.हे सण उत्सव साजरे करताना उत्साह कायम ठेवावा व घरातच थांबून ते साजरे करावेत. यासाठी जनजागृती आवश्यक आहे.पाऊस आणि कोरोना या दोन आव्हानांविरुद्ध लढाई आहे. सर्वांनीच आरोग्याची काळजी घ्यावी.असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.
     पोलिसांवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणारे लोक, वाहतूक समस्या असे विविध प्रश्न पोलिसांसमोर आहेत.त्यामुळे सोशल डिस्टेंसिंग नियम आदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागेल, तरच आपण अधिक सुरक्षित राहू, असेही ते म्हणाले.

गृह मंत्री अनिल देशमुख

        कोरोना विरुद्धची लढाई गेल्या तीन महिन्यापासून सुरू आहे. आपले पोलिस थोडे थकले आहे पण त्यांची हिंमत हरलेली नाही. गणेशोत्सवासाठी साठी राज्याचे पोलिस दल तयार,सुसज्ज आहे अशी निःसंदिग्ध ग्वाही गृह मंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली. परप्रांतीय कामगारांची वापसी, पावसाळा,कोरोना संक्रमण अशा अडचणी आहेत. पण शासन गणेशोत्सव साजरा करण्याबाबत ज्या काही सूचना देतील, त्याप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल तयार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

       मान्यवरांच्या सुचना

       मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी बैठकीच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
      मुख्य सचिव अजोय मेहता यांनी  कोरोना नियंत्रित आहे पण धोका टळला नाही असे सांगून  उत्सवाच्या  वेळी एकत्रित येणे हे कोरोनाविरुद्ध आहे.  त्यामुळे अधिककाळजी घ्यावी, असे आवाहन केले.          म.न.पा.आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी गणेशोत्सवात  महानगरपालिकेची काय तयारी झाली याची सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था या संदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल व मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पोलीस दलाच्या तयारीची माहिती बैठकीत दिली. पर्यावरण व ध्वनि प्रदूषण रक्षण करण्या विषयी विनंती एमपीसीबी चे सदस्य सचिव ई .रवींद्रन यांनी केली तर सोशल डिस्टेंसिंग चे पालन करण्याचे आवाहन आरोग्य संचालक अनुप यादव यांनी केले.
      या बैठकीत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष अँड. नरेश दहिबावकर, सर्वश्री जयेंद्र साळगावकर, मा.आ.विनोद घोसाळकर, दगडूशेठ हलवाई गणेश मंडळातर्फे अण्णासाहेब थोरात, बृहन्मुंबई गणेश मुर्तीकार संघाचे अध्यक्ष यांनीही अत्यंत महत्वाचा व उपयुक्त सूचना मांडल्या.
      गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी बैठकीच्या सुरुवातीला प्रस्तावना केली. कोरोना पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून राज्यातील विविध मंडळांचे पदाधिकारी यात सामील झाले असल्याची माहिती दिली. तसेच बैठकीचे संचलन ही त्यांनी केले. प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी शेवटी सर्वांचे आभार व्यक्त केले.
      या बैठकीस राज्याच्या सर्वच भागातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या

शिराळा कंटेंमेंट व बफर झोन वाचा



Post a Comment

0 Comments